महाराष्ट्रातील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहेत. सतत वादग्रस्त विधानं, विधान परिषदेमध्ये ऑनलाईन गेम्स खेळल्याचा आरोप आणि शेतकऱ्यांविषयी अपमानास्पद विधानांमुळे आता त्यांच्या मंत्रिपदावर गंडांतर आल्याचे संकेत मिळत आहेत.
मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत, कोकाटे यांची उचलबांगडी निश्चित?
सूत्रांच्या माहितीनुसार, कोकाटे यांचं कृषीमंत्रिपद काढून घेण्याचा निर्णय जवळपास निश्चित मानला जातोय. पण त्यांच्या पुनर्वसनाची शक्यता अजूनही कायम आहे. त्यांना मंत्रिमंडळात दुसरे खाते दिलं जाईल का, की थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नुकताच झालेला दिल्ली दौरा, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेली चर्चा या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाते.
अजित पवार – सुनील तटकरे बैठक, शरद पवारांचा हस्तक्षेप
शनिवारी रात्री अजित पवार आणि सुनील तटकरेंनी कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाची चर्चा केली. अजित पवार लवकरच पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करणार आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्याही राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोकाटे यांच्या राजीनाम्यावर दबाव वाढवला जात आहे.
शरद पवार हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित करतील, अशी शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कोकाटे यांची उचलबांगडी निश्चित मानली जात आहे.
🚆 तातडीने मुंबईकडे प्रयाण – शनिमंदिरात दर्शन
या सगळ्या घडामोडींमध्ये कोकाटे यांनी नंदुरबारमधील प्रसिद्ध शनिमंदिरात जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी नाशिकऐवजी थेट मुंबईकडे प्रयाण केले. ते दादर स्पेशल रेल्वेने रवाना झाले.
वादग्रस्त विधानं आणि पक्षांतर्गत नाराजी
कधी शासनाला भिकाऱ्याची उपमा, तर कधी ऑनलाईन रमी खेळण्याचे प्रकरण – अशा कृतींमुळे कोकाटे यांच्यावर पक्षांतर्गत नाराजी आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी त्यांना समज दिली होती. मात्र, तीन वेळा संधी दिल्यानंतरही वागणुकीत सुधारणा न झाल्यामुळे आता कठोर निर्णयाची शक्यता आहे.
पुढचा आठवडा निर्णायक?
अजित पवार लवकरच माणिकराव कोकाटे यांच्याशी थेट चर्चा करणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे पुढील आठवडा कोकाटे यांच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे